२०.७.०८

भरले कणीस माझे कोणी खुडून नेले?

भरले कणीस माझे कोणी खुडून नेले?
हंगाम संपलेला पक्षी उडून गेले.


 दुर्गंध येत आहे प्रत्येक बोलण्याला
त्या आतडयात वाटे काही सडून गेले

रामासमोर येथे झाल्यात वाटमा-या
-रामायणात नाही आत्ता घडून गेले.


पायात थांबलेले मुक्काम यातनांचे;
अश्रूत जीवनाचे
रस्ते बुडून गेले.

गोण्यात कातडीच्या लादून खुप ओझी;
हे पालखीत गोटे केव्हा चढून गेले?


माझ्याच अंत्ययात्रा कित्येक पाहिल्या मी-
माझेच प्रेत जेव्हा माझ्या पुढून गेले.

----------------------------------------
('आदिम' दिवाळी 1981)

कालाय तस्मै नमः

१९७८ मध्ये मी   पहिली गझल लिहिली : 'सांगू कशी फुलाचा देठास भार झाला'.
ती १८ मार्च १९७९ ला नागपूरच्या 'तरुण भारत' मध्ये प्रसिद्ध झाली.

१९७८ ते १९८५ या सात वर्षाच्या काळात लिहिलेल्या पन्नास गझलांचा संग्रह 'गुलाल '. 

तो १९८९ साली श्रीरामपुरच्या शब्दालय प्रकाशनाने प्रकाशित केला होता. 

१९८५ ते २००३ पर्यंत या अठरा वर्षाच्या काळात इतर काव्यप्रकारासोबत केवळ एकोणवीस गझला लिहून झाल्या.

'गुलाल ' वाचून कविवर्य ना.घ. देशपांडे आणि मंगेश पाडगावकरांनी सविस्तर पत्रे पाठवली. पु.ल. देशपांडे आणि वि.वा. शिरवाडकर यांनी प्रेरणादायी अभिप्राय पाठविले.

'गुलाल 'नंतरच्या गझला, वर उल्लेख केलेली पत्रे आणि अभिप्राय या सर्वांचा समावेश असलेला 'गुलाल आणि इतर गझला' हा संग्रह २००३ मध्ये मी स्वतःच प्रकाशित केला.

'गुलाल आणि इतर गझला ' ह्या संग्रहाची ही दुसरी आवृत्ती प्रकाशित करताना अगोदरच्या आवृत्तीमधील काही गझला वगळण्याजोग्या वाटल्याने त्या वगळल्या आहेत. तर १९७८ ते १९८५ ह्या कालखंडातील अलीकडे सापडलेल्या काही गझला ह्या आवृत्तीत पहिल्यांदाच समाविष्ट केल्या आहेत.

गझलांचे प्रत्यक्ष लेखन आणि त्यांची प्रसिद्धी यासंबंधी सापडलेल्या नोंदी गझलखाली दिल्या आहेत.


प्रस्तुत आवृत्तीत गझलांचा क्रम  पहिल्या ओळीनुसार आकार विल्हे घेतला आहे.

1 टिप्पणी:

prakashkshirsagar म्हणाले...

very best gazal
i like it
mazya blogla (prakashkshirsagar.blogspot.com) bhet dya