१६.५.०८

जेव्हा इथे दिव्यांच्या गेल्या विझून वाती

जेव्हा इथे दिव्यांच्या गेल्या विझून वाती;
आली अखेर माझ्या हातात फक्त माती.


श्वासात शाश्वतीचा चमके न काजवाही;
अंधार भोगणारी गर्विष्ठ मात्र छाती.


सोडून धर्मशाळा ही पाखरे प्रवासी;
अज्ञात त्या दिशेने कोठे उडून जाती?


आयुष्य-द्वारका ही जाता अशी तळाला;
तुळशीस कृष्ण आता लागेल काय हाती.


पिंडास टाळणार्‍या सर्वज्ञ कावळ्यांनी;
गुंतून ठेवलेली प्राणात सर्व नाती.


नीतीस वाव नाही,धर्मास भाव नाही;
मृत्यूस काय त्याचे जाती तशा जमाती.


रे दु:ख माणसाचे अंतिम सत्य आहे;
बाकी मवाळ सा‍र्‍या आहेत जाहिराती.

---------------------------------------------
('तरुण भारत'दिवाळी 1980)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: