पेज

२५.६.०८

आपण अचूक जेव्हा राजा धराल हाती

                                                          आपण अचूक जेव्हा राजा  धराल हाती;
बुद्धीबळास अपुल्या लागेल चाल हाती.

आहे विचार अमुचा झाडास भेट द्यावी;
येथील माणसांची काढून साल हाती.

जाळून आसवांनी हे टाकलेत डोळे;
जागीच राख झाला तेव्हा रुमाल हाती.

हे दुःख झेलतांना झालो विराट इतका;
पृथ्वीस तोलतो मी आता खुशाल हाती.

नाजूक फार सध्या आहेस रे दिव्या तू;
पेलेल का तुला ही जळती मशाल हाती.


--------------------------------------------
('दृष्टी' दिवाळी 1983)

■ लेखन : ६ जुलै १९८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा